COVID-19 योध्यांसाठी अमित ठाकरेंनी केली राज्यपालांकडे ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    कोरोना विषाणू संसर्गाच्या जीवघेण्या संकटात कोविड योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांच्या मुद्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत होते.

संपूर्ण देश सध्या कोरोना विरुद्ध लाढा देत आहे. यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे अर्थातच राज्यातील आरोग्य सेवेवर मोठा ताण आहे. या लढाईत राज्यातील सुमारे 2500 हजार निवासी डॉक्टर कोरोना योद्धा बनून अहोरात्र सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय व्हयला पाहिजे, अशी मागणी घेऊन अमित ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली.

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डीग्री व डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे 2500 विद्यार्थी मागील अडीच ते तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. एकीकडे ते रुग्णालयांत जीवन-मृत्यूशी झुंजणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत. तर दुसरीकडे सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. सुरूवातीला मे महिन्यात घेण्यात येणारी त्यांची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 5 जूनच्या आदेशानुसार ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. दुर्दैवाने हा निर्णय घेताना निवासी डॉक्टरांच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा विचारही विद्यापीठाने केला नाही, असा आरोप त्यांनी राज्यपालांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

सध्या वैद्यकीय आणीबाणीचा काळ असून अशावेळी निवासी डॉक्टरांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असून या गंभीर प्रश्नात लक्ष घालून निवासी डॉक्टरांनी सुचविलेल्या पर्यायाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
‘आशा’ सेविकांना 10 हजार रुपये मानधन द्यावे

राज्यामध्ये 72 हजार ‘आशा’ सेविका असून अमित ठाकरे यांनी त्यांच्यासाठीही आवाज उठवला आहे. आशा सेविका आरोग्य सैनिक बनून अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. खासकरून कोरोनाच्या काळात त्यांनी केलेला काम कौतुकास्पद आहे पण त्याना मिळणारा मोबदला फारच कमी आहे. सरकारने तो वढवून दिला पाहिजे अशी मागणी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.