3 खणखणीत ट्विट करत ‘मनसे’ने आदित्य ठाकरेंना सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच शिवसेनेकडून फेरीवाल्यांना दिलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे पक्ष आहे की संघटना हेच कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका करत खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता पुन्हा मनसेने तीन खणखणीत ट्विट करत आदित्य ठाकरे यांना सुनावल आहे.

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी तीन ट्विट करून आदित्य ठाकरे आणि शिवसेनाला जोरादर प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असे आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते, याला म्हणतात, टाइमपास. तसेच कोरोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते, याला म्हणतात, टाइमपास.. तसेच औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली, याला म्हणतात, टाइमपास… असे म्हणत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिवसेनेचा वाद आणखी चिघळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपानेही शिवसेनेवर टीका केली आहे. राम मंदीराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पद पथावरच्या लोकांकडून हप्ता वसुल करायचा, असा निशाणा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी साधला आहे. हप्ता वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांचा फोटो कोणी वापरत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच. मात्र अशा प्रकारे फोटो वापरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.