‘ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय Z सुरक्षा काढुन तीर मारणार आहात, महाविकास पण कुचक्या मनाचीच…’ : अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्याने पुन्हा एकदा राजकारण रंगू लागले आहे. मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरेंची ( Raj Thackeray) सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यावर मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी टीका केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, राम कदम यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. या यादीमध्ये अन्य भाजपाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. मात्र फडणवीसांची झेड सुरक्षा व्यवस्था कमी करत वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी केली आहे. अमृता फडणवीसांना दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत एक्स सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. तसेच दिवीजालाही दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत आता एक्स सुरक्षा दिली जाणार आहे.