‘मनसे’तून बाहेर पडलेल्यांबाबत राज ठाकरे यांनी केलं भाष्य; म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी 9 मार्चला साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जाहीर भाषण होणार नाही. पण अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून संदेश पाठवला आहे.

राज ठाकरे यांनी पाठवलेल्या ऑडिओ क्लिपच्या संदेशात विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की महाराष्ट्र सैनिकांची अफाट आणि अचाट शक्ती होती. या शक्तीचा कोणालाही हेवा वाटावा अशी होती. त्यांनी 15 वर्षांपूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा खरंच सांगतो मनात एक धाकधूक होती. मात्र, 19 मार्च 2006 मध्ये पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतीर्थावरील पहिल्या सभेत मी व्यासपीठावर पाऊल ठेवले आणि समोर उभा असलेला जनसमुदाय पाहिला आणि मनातील सर्व शंका दूर झाली.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे? वाचा त्यांचे सविस्तर भाषण…

सस्नेह जय महाराष्ट्र,

आज आपल्या पक्षाचा १५ वा वर्धापन दिन, त्याबद्दल तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा…आपण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली, पंधरा वर्षांपूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली; तेव्हा खरंच सांगतो मनात एक धाकधूक होती, महाराष्ट्रासाठी काहीतरी नवं करण्यासाठी धडपड तुम्ही सगळे कसे स्वीकारणार, लोक कसे स्वीकारतील अशी धाकधूक होती. पण १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतीर्थावरील पहिल्या सभेत मी व्यासपीठावर पाऊल ठेवलं, समोर पसरलेला जनसमुदाय पाहिला आणि मनातील शंका दूर झाली.

कोणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अफाट आणि अचाट शक्ती होती, या शक्तीचा माझ्यावर विश्वास आहे याची मला खात्री पटली. गेल्या पंधरा वर्षांत कितीही संकटं, खचखळगे आले तरी माझी महाराष्ट्र सैनिकरूपी संपत्ती माझ्यासोबत टिकून आहे. अडचणींचा डोंगर उभा राहिला तरी ती माझ्यासोबत आहे याच्या इतका आनंद दुसरा काय…आपल्यातील काहीजण सोडून गेले, त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ. पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे माझ्यासोबत आहात. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि पक्षाला जे जे यश भविष्यात मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल.

तुमच्या हातून जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचा माझं तुम्हाला वचन आहे. मी मनापासून सांगतो, की तुम्ही जे पंधरा वर्षांत करून दाखवलं आहे ते अचाट आहे, राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःची नोकरी-व्यवसाय सांभाळून तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात स्वतःच्या पद्धतीने जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि हे सगळं कशासाठी तर आपल्या भाषेसाठी आपल्या मराठी माणसांच्या हितासाठी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी… या सगळ्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहील, पण मी खात्रीने सांगतो की, महाराष्ट्राच्या मनातदेखील तुमच्याबद्दल कृतज्ञतेची भावना सदैव राहील. तुमच्या घरच्यांनीदेखील खूप केलं, खूप सोसलं मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनादेखील सांगू इच्छितो की, आपला प्रवास खडतर आहे, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या शुभेच्छांमुळे आणि आशीर्वादामुळे आमच्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही सगळे आव्हान सहज म्हणून पुढे जाऊ… बाकी कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे जेव्हा आपण भेटू शकत नाही.

मला कल्पना आहे तुम्ही मला भेटायला आतुर असाल, मी आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. हे तुम्हीही मान्य कराल, तुम्हाला समोर पाहता येणार नाही, प्रत्यक्ष भेटता येणार नाही आणि म्हणूनच हा रेकॉर्ड संदेशाचा मार्ग स्वीकारला आहे. पण ही परिस्थिती संपल्यानंतर आपण भेटणार आहोत हे नक्की…तेदेखील मोठ्या संख्येत… तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची तसेच आपल्या विभागातील नागरिकांची काळजी घ्या. वर्धापन दिनाच्या निमित्ताने १४ मार्चपासून आपण पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरू करत आहोत.

सदस्य नोंदणी म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राला दिलेलं आश्वासन, वचन आणि व्यक्त केली बांधिलकी…याबाबतचा फॉर्म कसा भरायचा याची चित्रफित आपल्या सर्वांच्या हातात पोहोचेलच त्यातल्या सूचना समजून घ्या, समजावून सांगा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगल कार्यात सर्वांना सामावून घ्या तुम्हाला पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

सदैव आपला नम्र
राज ठाकरे
”जय हिंद जय महाराष्ट्र ”