‘हे’ जर सरकारकडून होणार नसेल तर ‘मनसे’च्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय करणं आणि त्यांचा विस्तार करणं नित्याची बाब आहे. कधीही या महिलांनी कर्जाचा हप्ता चुकवण्यात दिरंगाई केली नाही. परंतु लॉकडाऊनमुळं या ग्रामीण भागातील महिलांचे व्यवसाय जवळपास ठप्प झाल्यानं त्यांना आर्थिक फटका बसला आहे. यातच मायक्रो फायनान्स कंपनीकडून महाराष्ट्रात दंडेलशाही सुरू केली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी लिहिलं की, “कोणत्या परिस्थितीचा विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, चारचौघात अपमान करणं असले प्रकार सर्रास करत आहेत. या विषयाच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारनं अंकुश ठेवायला हवा. कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हा विषय गंभीर आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर लक्षात ठेवा ह्याचे मानसिक आणि समाजिक परिणाम गंभीर असतील. म्हणून सरकारनं आता जागं व्हावं आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा आणि हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि ठाकरे सरकारला दिला आहे.

पूर्ण ग्रामीण भागात अर्थव्यवस्था गेले 6 महिने ठप्प आहे आणि अजूनही अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळं महिला कर्जाचे हप्ते भरू शकतील याची शक्यता नाही त्यामुळं महिलांचे कर्ज माफ करण्यासाठीही सरकारनं पावलं उचलायला हवीत, यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिला बटत गटाच्या महिलांकडून विमा उतरवतो हे सांगून त्या विम्याचा हप्ता गोळा केला आहे. परंतु जेव्हा व्यवसाय ठप्पे आहे आणि कर्जाचे हप्ते देणं महिलांना शक्य नाही अशा वेळेस या महिला विम्याच्या पॉलिसीची मागणी करत आहेत. तेव्हा मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याची कागदपत्रं देत नाहीत. महिलांनी जरी विम्याची रक्कम अदा केली आहे तरी विमाच उतरवला गेला नाहीये अशी शंका येत आहे. त्यामुळं महिलांना विम्याची कागदपत्रं मिळायलाच हवीत परंतु त्यांना विमा कवचाचा लाभ देखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.