तावडेंची हिम्मत असले तर… मनसेच्या नेत्याचे खुल्लं चॅलेंज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर टीका केल्यानंतर विनोद तावडे यांनी उत्तर दिल आहे. विनोद तावडे यांनी दिलेल्या उत्तराला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खुल आवाहन केले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर मोदींवर केलेले आरोप खोटे ठरवून दाखवावेत. जर तसे झाले नाही तर मी राजकारण सोडेन असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर मोदींवरील आरोप खरे निघाले तर तावडेंनी राजकारण सोडून द्यावे असेही देशपांडे म्हणाले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आरोपांना उधाण आले आहे.

काल झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला. नरेंद्र मोदींनी देश खड्ड्यात घातल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ते म्हणाले, नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवले, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता, त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार आहे?, नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या, खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगले देखील करून दाखवतील, असे राज ठाकरे म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींना पंतप्रधान करा, देश खड्ड्यात तरी जाईल किंवा चालेल तरी या वक्तव्यावर टिका करताना तावडे म्हणाले, देश खड्ड्यात घालायला हा काय मनसे आहे का ? ही कुठली भाषा, स्वत:च इंजिन बंद पडलंय, ते दुसऱ्याला लावून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवारांना तरी चालेल का हे एका त्यांना विचारुन बघा. नाहीतर पुढची स्क्रिप्ट येण बंद होईल अशी टीका तावडेंनी केली होती.