छत्रपती शिवाजी पार्कात काका-पुतण्या आमनेसामने ?; राज ठाकरेंच्या पत्रामुळे वातावरण तापणार

पोलिसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी पार्कला (Chatrapati Shivaji Park) शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (ShivSena and MNS) जडणघडणीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या छत्रपती शिवाजी पार्कातल्या सभांना मोठी गर्दी होते. याच मैदानावरून विरोधकांना शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्त्वानं अनेकदा आव्हान दिलं. याच मैदानातून ठाकरेंनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता शिवसेना- मनसे यांच्यातला वाद याच मैदानावरून पेटण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेनं छत्रपती शिवाजी पार्कच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं आहे. मनसे सीएसआर निधीतून पार्काचं नुतनीकरण करेल, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. ‘२०१२-१७ या कालावधीत नाशिक महापालिकेत सत्ता असताना आम्ही सीएसआर निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण सीएसआर निधीतून पूर्ण करू,’ असं पत्र मनसेनं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलं आहे. आम्ही छत्रपती शिवाजी पार्कात सीएसआर निधीच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला होता. पण २०१७ मध्ये बंद झाला. आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आम्हाला सीएसआर निधीतून छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी. पालिकेकडे निधीची चणचण असल्यानं त्यांनी नुतनीकरणाची निविदा प्रक्रिया थांबवावी,’ असं मनसेनं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंचं (Raj Thackeray) कोणतंही पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं चहल यांनी सांगितलं आहे. स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं निविदा प्रक्रियेला सुरुवातदेखील केली आहे. राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच पालिका अधिकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी पार्कला जाऊन आले. त्यांनीही पार्क आणि परिसराची पाहणी करून नुतनीकरण प्रकल्पाबद्दल काही सूचना केल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरण प्रकल्पात लक्ष घातलं आहे. त्यांनी काही वेळा छत्रपती शिवाजी पार्कला भेट देऊन तिथली पाहणीदेखील केली आहे.