तरूणांना समोसे, भजी तळा म्हणणाऱ्या मोदी-शहांनाच भजी तळायला लावा : अशोक चव्हाण 

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, हुकूमशाही आणू पाहणाऱ्या आणि तरूणांना समोसे आणि भजी तळा म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मतदारांनी सत्तेवरून खाली खेचून, समोसे आणि भजी तळायला लावावे. असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ एप्रिलला होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. दरम्यान, सबका साथ आणि सबका विकास असे म्हणणाऱ्या भाजपने केवळ स्वत:च्या पक्षाचा विकास केला आहे. त्यातून जमविलेल्या संपत्तीतून निवडणूक लढवीत आहेत. संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या मोदी आणि शहा या हुकूमशहांना घरी बसवले पाहिजे. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  म्हंटले. इतकेच नव्हे तर, देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, हुकूमशाही आणू पाहणाऱ्या आणि तरूणांना समोसे आणि भजी तळा म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मतदारांनी सत्तेवरून खाली खेचून, समोसे आणि भजी तळायला लावावे. असे आवाहनही केले. याचबरोबर, लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला मतदारांनी साथ दिली पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर बोलतांना, सुशीलकुमार शिंदे यांनीही भाजपवर निशाणा साधला. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. दोन वर्षांपासून ते अभ्यासच करीत आहेत. आता अभ्यास कसला करता, तुम्ही नापास झाला आहात. तुम्हाला घरी बसावे लागेल. जाती, धर्माच्या नावावर कोणी निवडून येता कामा नये. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवणाऱ्यांनी प्रत्यक्ष संसदेत हुकुमशाही सुरू केली. अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसविण्याचे पाप मोदींनी केले आहे. असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांचा अवमान करणाऱ्या उमेदवाराची पाठराखण करीत आहेत. निवडणूक हातातून जात असल्याचे दिसत असल्याने धार्मिक धु्रवीकरण करून देशात तेढ निर्माण करणाऱ्या मोदींना मते मागताना लाज कशी वाटत नाही ? अशी टीकाही त्यांनी केली.