कलम ३७० हटविल्यानंतर मोदी सरकार आता ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकार अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. तिहेरी तलाक आणि कलम ३७० हटविण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आता सरकार आणखी काय निर्णय घेणार यासंदर्भात अंदाज बांधले जात आहेत. अशातच आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकार घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि ओरिएंटल इंडिया विमा कंपनी लिमिटेड लवकरच एकाच विमा कंपनीमध्ये विलीन होणार असल्याचे समजत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या २०१९-२०च्या आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती, ज्यात जीवन-विमा कंपन्यांचे विलीनीकरण करण्यासाठी जनरल विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) अधिनियम १९७२ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव होता.

त्यानंतर अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सार्वजनिक क्षेत्रातील तीन सर्वसाधारण विमा कंपन्यांचे विलीनीकरण केले जाणार असल्याचे नुकतेच लोकसभेत सांगितले. या तीन सामान्य विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय भाषणात देखील केली होती. तथापि, या संदर्भात पुढे काहीही केले गेले नाही. या तिन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी अर्थ मंत्रालय आता मात्र गंभीरपणे विचार करत असल्याचे कळत आहे. आगामी काही दिवसामध्ये यासंदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त