‘मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाही’ : पी चिदंबरम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मोदी सरकार कोरोना साथीचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे असं म्हणत भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळंच जीडीपी पडल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. मोदी सरकार निर्लज्ज आहे, ते त्यांची चूक मान्य करणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

पी चिदंबरम म्हणाले, “आम्ही सरकारला यासंदर्भात सतर्कही केलं होतं. जगातील अर्थशास्त्रज्ञांनी भारताला इशारा दिला आहे. आरबीआयनं 3 दिवसांपूर्वीच आपल्या अहवालात हे सूचित केलं आहे.”

पी चिदंबरम म्हणाले, “पंतप्रधान आणि अर्थमंत्री वगळता सर्वांना माहित होतं की, भारताच्या अर्थव्यवस्थेचे संकट अधिकच खोलवर जाणार आहे. संपूर्ण देश त्याची किंमत मोजत आहे. गरीब निराश झाला आहे. परंतु मोदी सरकार याविषयी निश्चिंत आहे आणि त्यांना त्याची काळजी नाही. सरकारनं एक बनावट कथा तयार केली आहे. ज्याचं वास्तव समोर आलं आहे.”

सरकारला आणखी वेळ मिळायला हवा का ?

या प्रश्नाचं उत्तर देताना चिंदबरम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मोदी सरकारनं जे करायला हवं होतं ते केलंय असं कोणताही अर्थशास्त्रज्ञ मानत नाही. केवळ आरबीआयचा अहवाल वाचा. एकमेव क्षेत्रात 3.4 टक्के वृद्धी झाली आहे. ते शेती, वनीकरण आणि मस्त्यपालन आहे.

‘निर्मला सीतारमण यांनी देवाचे आभार मानावेत’

पी चिंदबरम म्हणतात, “शेतीचा सरकारशी फारसा संबंध नसतो. प्रत्येक क्षेत्र ज्यात सरकारची धोरणं ठरवतात की, उत्पादन काय करावं, काय विकलं पाहिजे आणि काय विकत घ्यायचं आहे. सुदैवानं या देशातील शेतकऱ्यांची शेती आणि त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. मी माझ्या निवेदनात असं म्हटलं आहे की, आर्थिक घसरणीसाठी देवाच्या क्रोधाला दोष देणाऱ्या अर्थमंत्र्यांनी खरोखरच गुप्तपणे देवाचे आभार मानले पाहिजेत की, त्यांनी देशातील शेतकऱ्यांवर कृपा केली आहे. कृषी वगळता इतर सर्व क्षेत्रात मोठी घट झाली आहे. उत्पादन, बांधकाम व्यापार, हॉटेल या सर्व गोष्टी 40 ते 50 टक्क्यांदरम्यान खाली आल्या आहेत.