80 लाख कर्मचार्‍यांच्या PF अकाऊंमध्ये सरकार ‘जमा’ करणार पैसे, दरमहा 15000 कमवणार्‍यांचे इतके रूपये होणार ‘बचत’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून देशाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने विविध श्रेणीतील लोकांसाठी अनेक मदत पॅकेजेसची घोषणा केली आहे. कमी उत्पन्न गटाच्या सुमारे ८० लाख कर्मचा-यांना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील तीन महिन्यांकरिता कंपनी आणि कर्मचार्‍यांच्या वतीने १२ टक्के + १२ टक्के रक्कम आपल्याकडून ईपीएफओमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील संघटित क्षेत्रे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ४ लाखाहून अधिक संस्थांनाही फायदा होणार आहे.

फक्त या लोकांना मिळणार फायदा ?
परंतु या योजनेच्या काही अटी आहेत. सरकारच्या या घोषणेचा फायदा फक्त अशा कंपन्यांना होईल ज्यांच्याकडे १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि ९०% कर्मचाऱ्यांचा पगार १५,००० रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच, ज्यांना १५ हजाराहून अधिक पगार मिळतो त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

कशी होणार बचत ?
सरकारच्या या निर्णयाचा १५ हजार रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. दरम्यान, वेगवेगळ्या कंपन्या मूलभूत पगाराचा निर्णय वेगवेगळ्या प्रकारे घेतात. म्हणजेच १५ हजार रुपये कमवणाऱ्या कर्मचाऱ्याची (बेसिक + डीए) ७००० रुपये आहे. या रकमेपैकी १२ टक्के ईपीएफ वजा केला जातो, म्हणजेच ८४० रुपये आणि तीच रक्कम नियोक्त्याने देखील दिली आहे. आता सरकारच्या निर्णयानुसार, पुढील तीन महिन्यांसाठी ते कर्मचारी आणि कर्मचार्‍यांच्या वाट्याचे १२-१२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करतील. म्हणजेच, सरकार कंपनीच्या वाट्याला ८४० रुपये आणि कर्मचार्‍याच्या वाट्याला ८४० रुपये देईल. अशा प्रकारे सरकार एकूण १६८० रुपये जमा करेल. म्हणजेच १५ हजार पगाराचा कामगार दरमहा सुमारे १६८० रुपये वाचवेल. आणि त्यानुसार, तीन महिन्यांत त्याला सुमारे ५०४० रुपयांची एकूण बचत मिळू शकते. दरम्यान, काही कंपन्या कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) मध्ये नियोक्ताचा काही भाग जोडतात.

७५ टाक्यांपर्यंत पीएफमधील पैसा काढू शकतील
याशिवाय अर्थमंत्री म्हणाले की, ईपीएफओमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेपैकी ७५ टक्के किंवा तीन महिन्यांच्या पगाराच्या तुलनेत कर्मचारी पैसे काढू शकतात. सरकार यासाठी ईपीएफच्या नियमात सुधारणा करेल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४.८ कोटी कर्मचार्‍यांना होणार आहे.