एक चिठ्ठी आली अन् मोदींनी कार्यक्रम अर्ध्यातच सोडला ; निवासस्थानी पुन्हा तातडीची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वातावरण तणावाचे आहे. त्यात सर्व देशाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लागले आहे. मोदी काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सकाळपासून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर मोदी युवासंसदच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी कार्यक्रमा दरम्यान मोदी अचानक कार्यक्रम सोडून निघून गेले. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे मोदी कार्यक्रमातून निघून गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युवा संसंदच्या कार्यक्रमात मोदी तेथील उपस्थित युवकांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांना एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर मोदींनी आपले भाषण आवरते घेतले. लगेच कार्यक्रमातून काढता पाय घेतला. मोदींच्या अशा जाण्याने तर्क-वितर्कांना उधान आले आहे.

मोदींनी कार्यक्रमानंतर लगेचच त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक त्यांनी घेतली. मात्र ही चिठ्ठी कोणी आणि का दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर चिठ्ठीत काय मजकूर होता हेही स्पष्ट झालेले नाही.