महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘मुली स्वतःहून ‘संबंध’ ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात’

बिलासपूर : पोलिसनामा ऑनलाईन – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून हा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असताना छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक यांनी बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात असं विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे.

किरणमयी नायक म्हणाल्या, एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर मुलींनी ती व्यक्ती आपल्याला सांभाळेल का, जगण्यासाठी मदत करेल का हे पाहणे आवश्यक आहे. परंतु असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश मुली थेट पोलीस ठाणे गाठतात.

अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे असं नायक म्हणाल्या.

लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. अशा अनेक घटना सांगता येतील. मात्र मला इतकेच आवाहन करायचे आहे की, महिलांनी आणि मुलींनी आधी नातं समजुन घ्यावं जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल असा सल्लाही नायक यांनी दिला.

लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला व पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे असंही त्या म्हणाल्या.