प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागात लेखणी बंद आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य सरकारकडे पदोन्नतीसह अनेक प्रलंबित मागण्यासांठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने 28 जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाकडे मागील 3 वर्षापासून विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. सदर निवेदनामध्ये एकुण 11 विषयाबाबत मागण्या करण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्याने विभागामध्ये मागील तीन ते चार वर्षापासून थांबविलेली सर्व संवर्गातील पदोन्नती तात्काळ देण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 15 टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. तथापी विभागातील कर्मचाऱ्यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये कोरोना आजाराने आत्तापर्यंत 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असून शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सुरक्षाविषयक सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी 28 जुलै रोजी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्ट पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.