कोरोनाचा हाहाकार ! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, सरकारच्या रेकॉर्डवर फक्त 4 जण

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या २४ तासांत भोपाळमध्ये १६८१ नवे रुग्ण समोर आले आहेत, तर ११२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी रेकॉर्डवर केवळ ४ जणांचाच मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कोरोना व्हायरसने मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रचंड थैमान घातले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असून वैद्यकीय साधनांचीही कमतरता भासू लागली आहे.

दरम्यान, लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे प्रशासनही भांबावले आहे. भोपाळमधील पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे. भोपाल, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेर येथे अंत्य संस्कारासाठी अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. स्मशान भूमीवत एका पाठोपाठ एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. भोपाळच्या सुभाष नगर विश्रामघाटावर गुरुवारी ५० मृतदेह आले. यांतील ३० मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदा विश्रामघाटावर ८८ मृतदेह आले. यांतील ७२ जणांवर कोरोना प्रोटेकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, झदा कब्रस्तान येथेही १७ पैकी १० मृतदेह कोविड प्रोटोकॉल प्रमाणे दफन करण्यात आले. म्हणजेच एकूण ११२ मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यात गुरुवारी १०,१६६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, ३,९७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. येथे आतापर्यंत ३.७३ लाख सक्रीय रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी ३.१३ लाख रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे. एवढेच नाही, तर यामुळे सरकारवही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यातच विरोधक सरकारवर सातत्याने मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस नेते अजय सिंह यादव यांनी सरकारवर मृतांच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत गंभीर नाही, असे अजय सिंह यांनी म्हटले आहे. तर, आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी विरोधकांच्या प्रश्नावर पलटवार करत, सरकार मृतांचा आकडा लपवत नाही. तसेच ज्या लोकांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. त्यांनाही संशयित मानले जात आहे, असे सारंग यांनी म्हटले आहे.