’56 इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणावरून आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली असताना सत्ताधारी पक्षांकडून मोहन डेलकर प्रकरणात केंद्रातील भाजपा सरकारने काय केलं? असा सवाल विचारला आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून यासंदर्भात मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत आपल्याच सरकारकडे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?
नाना पटोलेंनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहन डेलकर प्रकरणावरून आपली भूमिका मांडली आहे. “मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल खोडा पटेल आणि तिथल्या व्यवस्थेवर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये ज्यांची नोंद असेल, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत ही मागणी आम्ही केली आहे. एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातच्या भाजपा सरकारने केलं आहे. डेलकर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत ५६ इंच छातीचे पंतप्रधान आहेत. पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची जनता सुरक्षित कशी असेल?” अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय आहे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण?
५८ वर्षीय खासदार मोहन संजीभाई डेलकर यांनी मुंबईच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली. ते दादरा नगर हवेलीचे खासदार होते. आत्महत्येआधी डेलकर यांनी १४ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या नोटमध्ये राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे असल्याचे बोलले जात आहे. रविवारी रात्री डेलकर यांनी सोबत आणलेल्या शालीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचं ठरवूनच ते मुंबईत आले आणि हॉटेलमध्ये थांबले, असा तर्क लावण्यात येत आहे.

मोहन डेलकर यांची राजकीय कारकीर्द
मोहन डेलकर हे १९८९ मध्ये पहिल्यांदा दादरा-नगर हवेलीमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९१मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. तर १९९८ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. २००९मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काही अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.