‘मराठा समाजाचा उद्रेक झाला तर सरकारच जबाबदार’ : उदयनराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. सरकारनं मराठा बांधवांची परीक्षा पाहू नये मराठा समजाच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी ठाकरे सरकाराला केलं आहे.

उदयनराजेंनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली. तरीही सरकारनं 11 ऑक्टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. असं असताना, तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानाही सरकारला MPSC परीक्षा घेण्याची एवढी घाई का ?” असा सवालही त्यांनी केला आहे.

उदयनराजे म्हणतात, “एमपीएससी परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे तितकाच आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारनं एमपीएससीच्या परीक्षेासाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणतात, “येत्या 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारनं ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिक घेतली. मराठा आरक्षणाला कोर्टान स्थगिती दिल्यानंतर लगेच 15000 जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का आरक्षणाच्या स्थगितीमुळं मराठा समाजात मोठा संताप निर्माण झाला आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे.”

उदयनराजे असंही म्हणाले, “जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारनं परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये. सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्यानं घेता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या अशा परीक्षांसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वांनाच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळं कोणचीही संधी हुकणार नाही हे नक्की आहे. त्यामुळं आजतरी शासनानं या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय तात्काळ घोषित करावा.”

“कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिक बंद असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यास करणं शक्य झालं नाही. परीक्षेसाठी पोषक असं वातावरण नसताना सरकार या परीक्षा कशासाठी घेत आहे ? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाला तर याला कोण जबाबदार राहणार? त्यामुळं सरकारनं या परीक्षा तात्काळ पुढं ढकलाव्यात अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहिल” असा इशाराही त्यांनी दिला आहे.