‘त्या’ प्रकरणात आम्हा खेळाडूंची काय चुक होती? : महेंद्रसिंग धोनी

‘रोअर ऑफ द लायन’ या माहितीपटाद्वारे व्यक्त केले मत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएल २०१३मधील सामनानिश्चिती प्रकरणामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. त्या प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचे मन मोकळे केले आहे. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर आणि नैराश्यग्रस्त होता, असे महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे. शिवाय यात खेळाडूंची काय चूक होती?, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर धोनीने पहिल्यांदाच ‘रोअर ऑफ द लायन’ या माहितीपटाद्वारे आपले मत मांडले आहे.

सामनानिश्चिती प्रकरणात चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाचा सहभाग होता, त्यामुळे चेन्नईच्या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ‘‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच मी इतका नैराश्यग्रस्त झालो होतो. २००७ मध्ये आम्ही चांगले खेळलो नव्हतो, म्हणून आमच्यावर ती परिस्थिती ओढवली होती. पण २०१३च्या प्रकरणाला मात्र, एक वेगळाच रंग चढला होता. प्रत्येक जण फक्त सामनानिश्चिती प्रकरणाबाबत बोलत होता. आम्हाला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी खात्री होती. पण आमच्यावर दोन वर्षांचीच बंदी लादण्यात आल्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी, हेच कळत नव्हते, असं मत धोनीने व्यक्त केले.

आमच्या फ्रँचायझीकडूनच चूक झाली होती. पण यात खेळाडूंची काय चूक होती? आम्ही काय चूक केली, जेणेकरून त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागली. सामनानिश्चितीमध्ये माझेही नाव समाविष्ट आहे, अशी चर्चा होती. जर संघ या प्रकरणात सहभागी असेल तर माझाही त्यात सहभाग आहे, अशी चर्चा रंगत होती. क्रिकेटमध्ये कुणीही सामनानिश्चिती करू शकतो. त्या वेळी कुणीही येऊन आम्हाला विचारले नाही की, तुम्ही काय करत आहात? या प्रकरणाला कसे सामोरे जात आहात? याविषयी मी खेळाडूंशीही बोललो नाही. कारण क्रिकेटविषयीच्या त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, हीच माझी इच्छा होती, असंही धोनीने म्हटले.

जेव्हा या प्रकरणात गुरुनाथचे नाव समोर आले, त्या वेळी तो संघाचा भाग आहे, हे सर्वांनाच माहीत होते. पण तो मालक, संघ प्रमुख किंवा प्रोत्साहन देणारा यापैकी कोणत्या भूमिकेत होता, हेच मला माहीत नव्हते. गुरुनाथ हा संघाचा मालक आहे, असे आम्हाला फ्रँचायझींपैकी कुणीही सांगितले नाही. तो श्रीनिवासन यांचा जावई आहे, इतकेच आम्हाला माहीत होते, असंही त्याने सांगितले.

दरम्यान, सामनानिश्चित करण्याच्या प्रकरणी गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावरील सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाले होते. त्यामुळे २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.