महावितरणला महिन्याला 1200 कोटींचा फटका, 8000 कोटींच्या घरात थकबाकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वीज खरेदी आणि वीजपुरवठ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील तफावत आणि असणारी थकीत बिले यांमुळे महावितरणच्या कारभाराची घडी विस्कटलेली आहे. थकीत बिलांच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोना संक्रमणाच्या काळात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात थकीत बिलांचा आकडा तब्बल ८ हजार कोटींच्याही पुढे गेला आहे. दरम्यान, महावितरणची थकबाकी ५१,१३६ कोटीवरून ५९,१८२ कोटींवर पोहोचली आहे.

कोरोना काळातील पहिल्या सात महिन्यांत महावितरणने ३०,८८२ कोटी रुपयांची बिले घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिली. त्यापैकी जेमतेम २२,८५६ कोटी रुपयांच्या बिलांचा भरणा झाला. महिन्याकाठी सरासरी ४४०० कोटींची बिले दिली जात असली, तरी भरणा मात्र ३२०० कोटींच्या आसपास आहे.

ऊर्जामंत्र्यांनी दिलेले १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचे ठरवले तर वार्षिक ८ हजार कोटींची तूट येण्याची चिन्हे असून सध्याच्या आर्थिक कोंडीच्या काळात राज्य सरकारकडून ती भरून मिळण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे सुमारे एक कोटी वीज ग्राहकांचे मोफत विजेचे स्वप्न साकार होणे शक्य नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री सध्या याविषयावरून बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे.

विरोधकाकांकडून भांडवल होण्याची शक्यता
राज्यातील वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवा, असे ऊर्जामंत्र्यांनी काही दिवासांपूर्वी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. परंतु या मोहिमेला अद्याप म्हणावी अशी गती मिळू शकलेली नाही. कारणही तसेच आहे. काेराेनामुळे आर्थिक संकटात अडकलेले ग्राहक तसेच सरकारने १०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि वाढीव बिलांमध्ये सवलत या घोषणांची पूर्तता अद्याप न केल्याने कारवाई सुरू केल्यास विरोधकांकडून त्याचे भांडवल करून आंदोलने सुरू होण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ग्राहकांना फोन, ई-मेल करा, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा, जनजागृती मोहीम असा मवाळ प्लॅन तयार केला आहे.