‘नाथाभाऊं’ ची कन्या रोहिणी खडसेंचा पराभव करणारे विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून पराभव झाला. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनी या मुक्ताईनगरमधून विजय मिळवला आहे. त्यांनी 2328 मतांनी विजय रोहिणींचा पराभव केला आहे. खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विजयी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने नरकासुराचा वध झाला आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विजयानंतर तेथे ऐतिहासिक बदल झाला. विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिवाळीच्या निमित्ताने नरकासुराचा वध झाला आहे. या मतदारसंघात खडसेंनी 30 वर्षात कोणताच विकास केला नाही. त्यांना पक्षाने तिकीट नाकारले तर घराणेशाहीला उत आणत त्यांनी कन्येला समोर केले. याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती. लोकांनी आज हेच दाखवून दिले आहे.” असे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून हा विजय मिळवून आणला आहे. तुमच्याकडून कामे होऊ शकत नाहीत. तुम्ही यशस्वी नाहीत हे लोकांनी आज दाखवून दिलं आहे. विकासशून्य आणि घराणेशाही खडसेंना भोवली. सिंचन बेरोजगारी, चांगले शिक्षण यासाठी मी काम करणार आहे.” असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर मुक्ताईनगरमधून ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढली. हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला.

Visit : Policenama.com