… तर बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार : रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महत्त्वकांक्षी मुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला (Project) ठाणे महापालिकेने ब्रेक लावल्याने रेल्वे बोर्डाने प्लान ‘बी’ तयार ठेवला असल्याची घोषणा केली. जर महाराष्ट्रात जमीन मिळण्यास अडचण आली तर बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्ये चालवण्याचे संकेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव यांनी दिले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील आठवड्यात गुंडाळला. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावर बोलताना मंडळाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी महत्त्वाची माहिती दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारनं पुढील चार महिन्यात 80 टक्के जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी दिली असल्याचे यादव यांनी सांगितले.

यादव पुढे म्हणाले, जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. त्याचबरोबर जर जागा उपलब्ध करुन देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या (NHSRCL) माध्यमातून या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर 9 कोटी रुपये मोबदला दर निश्चित करण्यात आला आहे.