मुंबई महाराष्ट्राचीच ! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्याच्या नेत्यांमध्ये सीमावादाबाबत टीका-टिपणी होत आहे. तर काही दिवसापूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होत. त्याला प्रत्युत्तर देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार, असे त्यांनी सांगितले आहे. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं असावं, कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला असही अजित पवार म्हणाले.

या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. “असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा”, असा टोला संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना लगावला. यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत हे कर्नाटकने लक्षात ठेवावं, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.