NCP-काँग्रेस पक्षाचा मुंबईसाठी जगावाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबईत राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 25 जागंचे वाटप करण्यात आले आहे. तर मित्रपक्षांसाठी 5 जागा सोडण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली आहे. शरद पवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईसाठी राष्ट्रवादीने केवळ 6 जागांवर तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेस 25 जागांवर लढणार आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या विषयी विचारले असता त्यांनी उर्मिला मातोंडकर यांची समजूत काढण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान काही मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षात मतभेद आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी संदर्भात शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात आज चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आघाडी पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून बैठका सुरु असून यामध्ये जागावाटपाचे सुत्र निश्चित केले जाईल. जवळपास 225 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.