‘या’ महिन्यात पूर्णपणे Unlock होऊ शकते मुंबई !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशात राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा विळखा बसला असून मुंबईत जास्त रुग्ण आढळून आले आहेत. परंतु मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यास फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल असा दिलासादायक दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1 सप्टेंबरपासून रोज सरासरी 2 हजाराहून अधिकनं वाढत आहे. परंतु याआधी जेव्हा 7 हजार चाचण्या करण्यात येत होत्या तेव्हा 1100 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. आता 15000 चाचण्या केल्यानंतर 2000 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळं ही कोरोनाची दुसरी लाट नाही. चाचण्यांची संख्या वाढल्यानं रुग्णवाढ होत आहे असंही चहल यांनी सांगितलं आहे.

मुंबईत गेल्या महिन्याभरात कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे 2.2 टक्क्यांनी कमी झालं आहे. सध्या मुंबईत मृत्यूचं प्रमाण हे 4.5 टक्क्यांवर आहे. कोरोनाबाधितांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा देण्यासाठी पालिका सक्षम आहे असंही चहल यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मुंबईत जीम आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. धार्मिक स्थळं सुरू करण्याबद्दलही चर्चा सुरू आहे. याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबईत सध्या अनलॉकमुळं काही अटी या शिथिल करण्यात आल्या आहेत. परंतु लोकं अजूनही जबाबदारीनं वागत नाहीत. अनेक ठिकाणी लोक मास्क न घालताच वावरत आहेत. हे चिंताजनक आहे. मुंबईतून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. जर मुंबईकरांनी काटेकोरपणे नियमांचं पालन केलं, मास्क वापरला तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. जर असं झालं तर फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल असंही चहल यांनी सांगितलं.