रामदास आठवलेंचं खळबळजनक विधान, म्हणाले – ‘शेतकर्‍यांचं आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट’

पोलिसनामा ऑनलाईन – कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या किसान सभेच्या मोर्चात तब्बल २० हजार शेतकरी सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (ramdas athavale)  यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनात शरद पवार देखील सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाची गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.