मुंबईत मंदिरात भीषण आग, दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू तर 1 गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील (Mumbai) कांदिवली येथील चारकोप (Charkop) परिसरात एका मंदिरात भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या दोन तरुणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही दुर्दैवी घटना रविवारी पहाटेच्या सुमारास चारकोप येथील साईबाबा मंदिरात घडली.

सुभाष खोडे (वय-25) आणि युवराज पवार (वय-25) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर मनू गुप्ता हा 90 ते 95 टक्के होरपळला असून त्याच्यावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती महापालिकेने सांगितली.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळात ही आग सर्वत्र पसरली. चोरीच्या भीतीने त्यांना मंदिराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. यामध्ये दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

अग्निशमन दलाला पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी, कर्मचारी बंबासह साडेचार वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केवळ नऊ मिनिटांत आग नियंत्रणात आणली. मात्र दोघांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला अशी माहिती अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.