मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मुंबई- गोवा जलमार्गावर सुरु केलेली आंग्रीया क्रुझ सेवा नेमकी कोणासाठी आहे? कोकणात एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच आहे, असा आरोप खासदार नीलेश राणे यांनी केला आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय आंग्रीया क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई ते गोवा जलमार्गावर देशातील पहिल्या आंतरदेशीय आंग्रीया क्रूझला नुकताच हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास होणार आहे. या क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. मुंबई – गोवा मार्गावरील आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्या साठीच आहे असे वाटते. मध्यमवर्गीय व पर्यटनासाठी या क्रूझचा उपयोग शून्य, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जाहिरात