राज्याच्या तुलनेत मुंबईचा ‘कोरोना’ रुग्ण मृत्युदर कमी

मुंबई : राज्याच्या तुलनेत मुंबईचा कोरोना रुग्ण मृत्युदर कमी झाला आहे. जुलै, ऑगस्ट मध्ये 4.9 ते 5 असलेल्या मुंबई शहराच्या कोरोनाच्या मृत्युदरात घट झाली असून तो आता 1.97 टक्के झाला आहे. राज्याचा मृत्युदर सध्या 2.62 टक्के आहे. कोरोनाचा राष्ट्रीय मृत्युदर 1.46 टक्के आहे. या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक आहे. परंतु, राज्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, अशी माहिती मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश सुपे यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रात आयसीएमआर व जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णसंख्येचे विश्लेषण केले जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास त्याचे तेच कारण ग्राह्य धरले जाते, मात्र महाराष्ट्रात अशा मृत्यूची नोंद कोरोना मृत्यू म्हणून होतो. त्यामुळे इतर राज्यांची संख्या तुलनेने खुप कमी दिसते. ही मोठी संख्यात्मक तफावत यामुळेच दिसून येत आहे.

डॉ. सुपे म्हणाले की, विशेष म्हणजे आपल्याकडे अजूनही उशिराने रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अशा रुग्णांचा 24-48 तासांत मृत्यू होतो. शिवाय, अधिकाधिक मृत्यू हे वय अधिक असल्याने होतात. तसेच अतिजोखमीच्या आजारांमुळे होतात.