‘कोरोना’मुळे नुकसान ! चीनने 190 लाख कोटी द्यावेत’, मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात संकट उभे केले आहे. त्यासाठी अमेरिकेसह इतर देशांनी चीनला जबाबदार धरले आहे. कोरोनामुळे जणू संपूर्ण जगच थांबले आहे. मोठे आर्थिक नुकसानही प्रत्येक कोरोनाबाधित देशाला सहन करावे लागत आहे. दरम्यान, मुंबईतील एका वकिलाने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरोधात धाव घेतली आहे. त्यांनी चीन विरोधात आंतराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

काय आहेत याचिकेतील महत्वाचे मुद्दे

— कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने पावले उचलली नाहीत आणि त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव देशाबाहेर होऊ दिला असे आरोप आशिष यांनी याचिकेत केला आहे

–कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून चीनने 190 लाख कोटी रुपये द्यावेत अशी मागणी करणारी 33 पानांची याचिका आशिष यांनी दाखल केली आहे.

–चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोग, हुबेई प्रांत सरकार आणि वुहान महापालिका यांचाही याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे

–आरोग्य आयोग आणि महापालिकेने मानवतेविरोधात कृत्य केलं असल्याचं आशिष सोहनी यांनी याचिकेत म्हटलं.

–हा व्हायरस किती भयंकर आहे, त्याची चीनला पूर्ण कल्पना होती आणि त्याचे पुरावे देखील आहेत. तरीही त्यांनी सुरुवातीच्या स्टेजमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार काही केले नाही असे सोहानी यांचे म्हणणे आहे.

कोण आहेत आशिष सोहानी

या वकिलाचे नाव आशिष सोहानी असे आहे. आशिष मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त प्रदीप सोहनी यांचा मुलगा आहे. आशिष सोहानी यांची आई मुंबई फॅमिली कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आहेत. त्याने चीन विरोधात खटला दाखल करण्यासाठी आंतराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडे धाव घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल

आंतरराष्ट्रीय न्यायालयाशिवाय आशिष यांनी सर्वोच्च न्यायालयातसुद्धा चीन विरोधात याचिका दाखल केली आहे. कलम 25(1) नुसार चीनने मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाच्या कलम 2,3,5,6,7,8 आणि 9 चे उल्लंघन चीनने केलं असल्याचा आरोप आशिष यांनी केला आहे.

11 एप्रिल रोजी आशिष यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टात ई-याचिका दाखल करण्यासाठी पाठवली. यावर तीन दिवसांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून याचिका विचाराधीन असल्याच कळवण्यात आलं आहे.