महाराष्ट्रात नवीन समीरकरण बनणार ? भाजपानं लवकरच सरकार बनवण्याचा केला ‘दावा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या नेतृत्वात लवकरच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून असून काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपकडे 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपचेच सरकार बनणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची चर्चा अंतिम टप्प्यात असून पाटील यांच्या या विधानाला त्यामुळे महत्व प्राप्त झाले आहे. मात्र इतर पक्षांच्या वतीने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

भाजपसाठी राष्ट्रवादी एकमेव पर्याय –

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नसल्याने त्यांच्याकडे आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव पर्याय उरला आहे. तर पाटील यांनी सत्तास्थापनेचा पुन्हा एकदा दावा केला असल्याने यामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. त्याचबरोबर या सर्व घडामोडींकडे आमचे बारीक लक्ष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

भाजपला मिळाली 1.42 कोटी मते –

विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीबद्दल बोलताना पाटील म्हणाले कि, आमच्या पक्षाला 1.42 कोटी मते मिळाली असून आम्ही पहिल्या स्थानावर आहोत. तर 92 लाख मतांसह राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 90 लाख मतांसह शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत.

Visit : Policenama.com