सुरुवातीच्या काळात म्हणजे १ फेब्रुवारी ते २२ मार्च या दरम्यान परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. त्या काळात परदेशातून दोन लाख प्रवासी मुंबईत आले. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
९ मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटुंब आखाती देशातून आले हाेते. तर, मुंबईत आढळलेला पहिला रुग्णही याच प्रवाशांबराेबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. तर परदेशातून आलेले काही प्रवासी इतर विमानतळांवर उतरून मुंबईतील आंतरदेशी विमानतळावर येत होते. सुरुवातीला आंतरदेशी विमानतळावरही प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात नव्हते, असे पालिका आयुक्तांनी निदर्शनास आणले.