मंत्रालयात सामान्यांना 31 मार्चपर्यंत प्रवेश बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने आता जगभर आपली दहशत पसरवली आहे. भारतातही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात ११६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज, जिम, सिनेमागृह, मॉल्स ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मंत्रालयात सामन्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

३१ तारखेपर्यंत सामान्य व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश नाही :
विविध कामाच्या निमित्ताने राज्यभरातील लोकं मंत्रालयात येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 31 मार्चपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच आता मंत्रालयात जाता येणार आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात :
राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे. तर टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-16, मुंबई-8, ठाणे-1, कल्याण-1, नवी मुंबई-2, पनवेल-1, नागपूर-4, अहमदनगर-1, यवतमाळ-2, औरंगाबाद-1 अशी रुग्णांची संख्या आहे.