‘कोरोना’च्या लसीमुळं नपुंसकत्व येतं, नजर देखील जाते ? , जाणून घ्या ‘सत्य’

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि ५५ लाख डोस कोव्हॅक्सिनचे पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी विकत घेतले आहेत. या दोन्ही लसींबाबत सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे, परंतु या लसीकरणाच्या (corona vaccination) मोहिमेत गैरसमजुतीमुळे अनेक अडथळे येत आहेत. लसीकरण (corona vaccination) व लोकसंख्या हा अभ्यासाचा विषय आहे. कारण पोलिओचे लसीकरण करतानासुद्धा अशाच अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु, सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने आपण पोलिओला देशातून घालवले आहे.

कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते, नजर जाते पासून ते थेट परत आपल्या शरीरात कोरोनाचे विषाणू जातात अशा अनेक अफवा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. हीच एक गोष्ट लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण करतेय. दरम्यान, भारतातील लोकसंख्येचा विचार करता सरकारने सगळ्यात आधी आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आधीपासून एखादा गंभीर आजार असलेले लोक यांना आधी लस देण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर ज्यांना गरज असेल अशा सगळ्यांना लस देण्यात येईल.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ प्रदीप शेलार यांनी सांगितले की, “आज भारतातील ६० टक्के नागरिक सोशल मीडियाचा वापर करत असून ही संख्या दर मिनिटाला वाढत आहे. फेसबुक, WhastaApp, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाचा वापर तरुण पिढीमध्ये वाढत आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणामुळे होणाऱ्या साईड इफेक्टच्या बातम्या या घराघरात वाचल्या जातात आणि त्यातून एक अनामिक भीती निर्माण होत आहे आणि हाच एक मोठा अडथळा आहे. यासोबतच आपल्या देशाची लोकसंख्या १३० करोड आहे आणि कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. तर १,४५,२०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून नागरिकांमध्ये कोरोनाची भीती निघून गेली आहे व नागरिक आता बिनधास्तपणे जगत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सुद्धा अनेक अफवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या गेल्या होत्या व त्यामुळे उपचारासाठी अडथळे निर्माण होत होते. लसीकरणाबाबत सुद्धा हेच होत आहे. परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकारला येत्या काळात नक्कीच यश येईल कारण चुकीच्या बातम्यांचे आयुष्य फारच छोटे असते व आपण सर्वानी याचा अनुभव कोरोना संक्रमण काळात घेतला आहे.

कोरोना हा विषाणू अस्तित्वात नाही इथपर्यंत चर्चा रंगल्या होत्या. परंतु कोरोना विषाणूचे अस्तिव आपण सर्वानी मान्य केले, त्याचप्रकारे लसीकरणाचे महत्व भारतातील नागरिकांना भविष्यात कळेल अशी मला आशा वाटते. साईड इफेक्टचा विचार केला तर जेंव्हा तुम्ही तापावर एखादी गोळी घेता तेंव्हा सुद्धा शंभर पैकी कमीत कमी २ रुग्णांना या औषधाचा साईड इफेक्ट होत असतो. परंतु तो त्यांना जाणवत नाही, त्यामुळे सोशल मीडियावरील माहितीचा आधार न घेता डॉक्टरांना भेटून नागरिकांनी त्यांच्या शंका दूर करायला हव्यात.

केंद्र सरकारने कोरोना लस कोणी घेऊ नये याबाबत खालील नियमावली जाहीर केली आहे.

– जर तुम्हाला कुठलं औषध, अन्नपदार्थ किंवा कुठल्या दुसऱ्या कारणाने एखादी ऍलर्जी असेल तर तुम्ही कोव्हिशील्डची लस घेऊ नका.
– तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही लस घेऊ नका
– जर तुम्ही थॅलेसिमियाचे रुग्ण आहात किंवा अन्य कुठला रक्ताचा आजार आहे, तर तुम्ही कोरोना लस घेऊ नये.
– महिला गर्भवती आहे किंवा गर्भधारणेचा विचार करत आहात, तर तुम्ही कोरोना लस घेऊ नये.
– स्तनपान करणाऱ्या मातेने लस घेऊ नये.
– कोरोनाबाबत तुम्ही यापूर्वीच एखादी लस घेतली असेल तर तुम्ही कोव्हिशील्ड लस घेऊ नका.
– त्याचबरोबर लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला कुठली ऍलर्जी झाली असेल तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.