Lockdown : हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, अजित पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लक्ष्मणाचे प्राण वाचण्यासाठी हनुमानाने औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण पर्वत उचलून आणला होता. मात्र, आज जनतेला वाचण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच राहा आणि हनुमान जयंती साजरी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तर कोरोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरिकाचं आज एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडणं, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा-अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावी, कोणीही घराबाहेर पडू नये, असे अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, अजित पवार यांनी आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ‘आरोग्यम धनसंपदा, आरोग्यासारखं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धती वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनं, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. हे ‘कोरोनाच्या’ निमित्ताने आज पुन्हा एकदा लक्षात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याच त्यांनी म्हटलं.

तर गंभीर गुन्हे दाखल करू….

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज शेकड्याने वाढ होत असून, ही वाढ राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. नागिरकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. राज्यातील ज्या भागात कोरोना संसर्गित रुग्ण सापडले आहे. ते भाग शासनाने सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहे. बंदी आदेश जारी करण्यात आला असून, बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकलं जाईल. कोरोना संसर्गा संदर्भात शासन अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना संसर्ग प्रसार करणाऱ्यांवरती सरकार गंभीर गुन्हे दाखल करणार असून, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.