युवकांच्या आवाजाची ताकद वाढतेय : उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीतील जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाने नोंदवला. मुंबईत देखील विद्यार्थ्यांनी, तरुणांनी शांततापूर्ण निदर्शने करत आपला निषेध व्यक्त करून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला. पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र, मुंबई हायकोर्टाने आज मुंबईतल्या आंदोलकांचे कौतुक केले आहे. तरुणांच्या आवाजाची ताकद वाढत आहे. तरुणाई आपल्याला शिकवत आहे, तिकडे लक्ष द्या, असे म्हणत कोर्टाने तरुणांच्या आवाजाकडे समाजाचे लक्ष वेधलं आहे.

आजकाल समाजातील सदस्य एकत्र जमून शांततेत आंदोलन करत आहेत. यातून त्यांच्या आवाजाची ताकद वाढत आहे. आजची तरुणाई हे आपल्याला शिकवत आहे. ज्येष्ठांनीही त्यातून शिकण्यासारखे आहे, असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले. जेएनयू प्रकरणानंतर मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाविषयी मुंबई हाय कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. शिवाजी पार्क मैदान आणि त्यावरील कार्यक्रम या विषयावरील याचिकेवरील सुनावणीच्या निमित्ताने हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले.
जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलन सुरु होते.

या वेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. गेटवे ऑफ इंडियावर गर्दी होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी नकार दिल्याने मंगळवारी सकाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांची आझाद मैदाना पाठवणी केली. यावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावणाऱ्या विद्यार्थीनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/