मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 जणांचा मृत्यू

पुणे : (लोणावळा) पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यामध्ये मतदान होत आहे. मुंबईहून खासगी बसने सातारा येथे मतदानासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यापासून काही अंतरावर पहाटे चारच्या सुमारास झाला.

सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. धडक बसल्यानंतर बस उलटल्याने झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते.

कामशेत बोगद्यापासून काही अंतरावर सोमवारी (दि.21) पहाटे चारच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. बस बऊर गावाजवळ आल्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर माहामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Visit  :Policenama.com