मुंबईत 26 वर्षानंतर सप्टेंबर महिन्यातील पावसाने मोडला ‘हा’ विक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबई व मुंबई उपनगरात काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरल्याने अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे. अशा पावसाची गणना अतिवृष्टीमध्ये करण्यात येते. मुंबईत पडलेल्या या पावसाने नवा विक्रम केला आहे. मुंबईत गेल्या अडीच दशकात पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस पडला आहे. या पावसाने २६ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस पडला आहे. तसेच १९७४- २०२० या कालावधीत मुंबईत सर्वाधिक पाऊस पडण्याची हि चौथी वेळ आहे. मंगळवारी कोसळलेल्या या पावसानं मुंबईकरांच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी ५. ३०पर्यंत मुंबईत २८६.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, दक्षिण मुंबईत म्हणजेच कुलाब्यात १४७.८ मिमि पाऊस पडला. तर, मंगळवारी संध्याकाळी ५.३० ते ११.३० या सहा तासांच्या कालावधीत मुंबईत १०७ मिमि पावसाची नोंद झाली आहे. तर, रात्री ११.३० ते ५.३० या सहा तासांमध्ये दक्षिण मुंबईत ८९ मिमि पावसाची नोंद झाली आहे.मंगळवारी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचून अनेक रस्ते जलमय झाले होते. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून संपूर्ण रेल्वेरूळ पाण्याखाली गेले होते. सायनजवळ लोकल खोळंबल्याने अनेक प्रवाशांची कोंडी झाली होती.

सध्या तरी फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे तरीही उपनगरांच्या दिशेने जाणारे प्रवासी सायन स्टेशनमध्येच अडकून राहिले होते. मुंबईत आजही रात्रभर पावसाचा जोर कायम राहणार असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. तसेच अजून परतीच्या पावसालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईमध्ये अजूनही पाऊस कोसळेल का, अशी चिंता लोकांकडून व्यक्त केली जात आहे.