सावधान ! मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई आणि महानगरात पावसाचा कहर अजून सुरु असून येत्या 24 तासांत कोकण पट्टयात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोरोनाच्या संकटात बाहेर पडणार्‍या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे.तर येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे 150 मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई उपनगरात सुमारे 300 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.