मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईचं रुपडं आता पालटणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की मुंबई आखीव-रेखीव होईल. मे महिन्यात मेट्रो सुरु होईल. तसेच बेस्ट बसची संख्याही दहा हजार होईल. कोस्टल रोडचे काम सुरु आहे.
बंगळूरू येथून मुंबईत दाखल झालेल्या मेट्रोचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकलला पर्याय मिळाल्याने त्यावर येणारा ताण कमी होईल आणि रेल्वेची गर्दी कमी होईल. तसेच प्रवाशांनाही या मेट्रोसेवेमुळे पर्यायी वाहतूक उपलब्ध होऊ शकेल. आपली मेट्रो ही चालकविरहित असणार आहे’.
मुंबईतील मेट्रोचे काम जगात कोठेही नाही
मुंबईत जितकी मेट्रोची कामे सुरु आहेत ती जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. दरम्यान, मागील सरकारने ज्या वेगाने कामे केली त्यापेक्षा अधिक वेगाने ही कामे आम्ही करू.
नवी मेट्रो मुंबईत दाखल
नवी मेट्रो मुंबईत दाखल झाल्याने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मेट्रो ही मुंबईचे आकर्षण आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.