मुंबईचे ‘बिर्याणी किंग’ जफरभाई मन्सुरी यांचं ‘कोरोना’मुळं निधन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल सहा दशके मुंबईतील खवय्यांना लज्जतदार बिर्याणीची मेजवानी देणारे मुंबईतील ‘बिर्याणी किंग’ व ‘दिल्ली दरबार’ रेस्टॉरंटचे मालक जफरभाई मन्सुरी (वय-83) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचे निधन झाले.
सात दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. उपचार सुरु असतानाच गुरुवारी त्यांचे निधन झाले. मरिन लाईन्स येथील स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या मागे चार मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.
जफरभाईंनी दिल्ली दरबार या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर जफरभाई दिल्ली दरबार या नावानं स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती. मरिन लाईन्स, माहीम, ग्रँट रोड, जोगेश्वरी, वाशी, डोंगरी, मोहम्मद अली रोड येथे जाफरभाईंनी दिल्ली दरबारच्या शाखा सुरु केल्या. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला मोगलाई पदार्थांची आवड असलेल्या खवय्यांचं केंद्र बनवलं होतं.
जाफरभाईचे निकटवर्तीय असलेले प्राध्यापक कासिम इमाम यांनी सांगितले की, तरुणपणात जाफरभाई हे कामाठीपुरा जवळच्या इस्लामपुरामध्ये एक छोटीशी खानावळ चालवत हेते. राजकीय व धार्मिक सभांच्या वेळी त्यांच्या हॉटेल मधून जेवण मागवले जायचे. एका जुन्या सायकलवरुन ते ऑर्डर पोहोचवण्यासाठी जायचे. एवढेच नाही तर त्यांना गझल आणि मुशायऱ्यांची आवड होती. कव्वालीच्या मैफलींमध्ये ते सहभागी होत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जांची अनेक काव्य संमेलनेही आयोजित केली होती.