मुंबईच्या ‘कोरोना’ नियंत्रण कामगिरीची ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं घेतली दखल

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह परिसरातील अर्थात उपनगरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाला नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे. या कामगिरीची दखल आता अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली आहे. मुंबईतील वरळी, धारावी आणि पश्चिम उपनगरातील कोरोनासह आता मुंबईतल्या कोरोनावर महा पालिकेने नियंत्रण मिळविले आहे, असा दावा मुंबई महापालिकेकडून केला आहे.

मुंबईमधील कोरोना वाढते रुग्ण, बरे रुग्ण आणि मृत्यू याबाबतचे आकडे पारदर्शक असून, मुंबई महापालिकेचे काम परिणामकारक आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवता येते, हे जगाला दाखवून दिले. या स्वंयशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला. हे कौतुक होत असतानाच आता अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने देखील मुंबई महापालिकेच्या कामगिरीची दखल घेतलीय. मुंबईमध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका परिणामकारक काम करत आहे. येथील संसर्ग, रुग्ण, मृत्यू याबाबतची आकडेवारी पारदर्शक असून यात कोणतीही लपवा-छपवी केली जात नाही, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केलाय. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतातील कोरोनाबाधित मृत्यूच्या आकडेवारीबाबत लपवाछपवी होत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्ता येथील मृत्यूबाबतची आकडेवारी मागविली होती. याबाबत मुंबई महापालिकेने सर्व अद्ययावत माहिती सादर केली आहे, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कामगिरीची देखील घेतली आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने सुरु होत असतानाच चहल यांची आयुक्तपदी नेमणूक झाली आहे. चहल यांनी कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत याची कामगिरी पारदर्शक राहील, यावर भर दिला आहे. परिणामी, सध्या तरी सर्वच स्तरातून महापालिकेच्या या कामाचे कौतुक होत आहे.

‘चेस द वायरस आणि ट्रेसिंग-ट्रॅकींग- टेस्टींग-ट्रिटिंग’च्या चतु:सूत्रीवर भर
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ’चेस द वायरस आणि ट्रेसिंग-ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग’ ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रभावीपणे शोध घेऊन संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयित आणि बाधितांच्या कोरोनाविषयक वैद्यकीय चाचण्या करणे, लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे. वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल 24 तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल, त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार प्रभावी कार्यवाही केली जात आहे. या अभियान पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण आणि गरजेनुसार औषधोपचार करण्याची कार्यवाही केली जात आहे.

प्रिस्क्रीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय :
खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय कोरोनाविषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला होता. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वी केला होता. त्यानुसार कोरोना संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण केला जात आहे.

वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश :
‘चेस द व्हायरस’ हे सूत्र घेऊन फिव्हर क्लिनीक्सच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला. त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्यावेळीही वैद्यकीय शिबिरे आयोजित करावेत, असे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.

आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश :
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याची आकडेवारी आणि तपशील हा मृत्यू झाल्यापासून 48 तासांच्या आत व निर्धारित नमुन्यात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय. सी. एम. आर.च्या संकेतस्थळावर अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार ही आकडेवारी 48 तासांच्या अपलोड करावेत, असेही निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.