मुजफ्फरनगर दंगल : सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

मुजफ्फरनगर : वृत्तसंस्था – मुझफ्फरनगरमध्ये २०१३ साली झालेल्या दंगलीवेळी कवाल या भागातील सचिन ममेरे आणि गौरव ममेरे या दोन हिंदू युवकांना जमावाने ठार मारले होते. या दंगलीत एकूण ६३ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० हजार लोक विस्थापित झाले होते. सचिन आणि गौरव या दोन ममेरे बंधूंच्या खून प्रकरणी सर्व ८ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे.


अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती हिमांशु भटनागर यांनी मुझम्मिल, मुजासिम, फुरकन, नदीम, जहांगीर, अफझल आणि इकबाल या सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ८ आरोपीपैकी शाहनजाव याचा मृत्यू झाला आहे.

सहा वर्षापूर्वी २७ ऑगस्ट २०१३ ला कवाल हत्याकांडच्या नंतर मुजफ्फरनगर आणि शामली येथे दंगली वाढल्या होत्या. यामध्ये ६० पेक्षा जास्त लोक मरण पावले तर शेकडो परिवार बेघर झाले. २०१३ मध्ये सचिन आणि गौरव या दोन तरुण आणि आरोपी यांच्या मोटारसायकलची टक्कर झाल्यानंतर मारामारी झाली होती. यामध्ये दोन तरुणांची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर आरोपीपैकी शाहनवाज याचाही यात मृत्यू झाला होता. यानंतर मुजफ्फरनगर आणि शामलीमध्ये सांप्रदायिक दंगली भडकल्या, अशी माहिती सरकारी वकील आशिष कुमार त्यागी यांनी याप्रकरणा दरम्यान सांगितली.

मृत गौरवच्या वडिलांनी जानसठ पोलिसात कवालच्या मुजस्सिम, मुजम्मिल, फुरकान, नदीम, जहाँगीर, अफजाल आणि ईकबाल यांच्या विरुद्ध खून खटला दाखल केला होता. तर मृत शाहनवाज याच्या वडिलांनी सचिन आणि गौरव यांच्यासह त्यांच्या परिवारातील पाच सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. विशेष तपास यंत्रणेने चौकशीनंतर या हत्याकांडाचे प्रकरण न्यायालयात सादर केले होते.