मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं महत्वाचं विधान, म्हणाले – ‘जंगलांचा र्‍हास करणार्‍या विकासाला माझा विरोध’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विकासकामे करताना निसर्गाचे रक्षण अन् संवर्धन कसे होईल याबाबत सल्ला देणारी संस्था स्थापन करावी आणि हा सल्ला बंधनकारक असेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 22) दिले. तसेच जंगलतोड करून होणाऱ्या विकासाला कायम आपला विरोध असतो असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित वेबिनारमध्ये मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. आपला विकासाला विरोध नाही, तर निसर्गाच रक्षण करून विकास करण्याची संकल्पना आपल्याला मान्य आहे. वन्यजीव मानवी वस्तीवर कधीही अतिक्रमण करीत नाहीत. माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत आहे. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगून मोकळे होतो. पण हवामान बदलास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. याचा आपण विचार करत नाही. जैववैविधतेबद्दल जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील यांनी जैवविविधता मंडळाच्या कामाची माहिती दिली. पर्यावरण रक्षण अन् संवर्धनातून विकासाची संकल्पना पुढे नेल्यास हा विकास शाश्वत ठरेल आणि मानवास कल्याणकारी ठरेल असे ते म्हणाले. प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी राज्यात 28 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदींचे काम केले जात असल्याचे सांगितले.