शेतीच्या वादातून खून करणार्‍या चौघांना जन्मठेप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील रहिवाशी राजेश भाग्यवान शिशूपाल (वय 31) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर दोन महिलांसह चौघांना एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा देण्यात आली आहे.
जन्मठेप झालेल्यांमध्ये श्रीराम भाऊ पंडित (वय 55),  प्रशांत श्रीराम पंडित (वय 23), नितीन श्रीराम पंडित ( वय 38),  देवीदास शंकर पंडित( वय 36, सर्व रा. शिरापूर, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. मंदा श्रीराम पंडित, सविता नितीन पंडित, अक्षय श्रीराम पंडित व शंकर भाऊ पंडित यांना एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
राजेश हा भाऊ जयविंदर बलदेवसिंग भामरा व तेजंदर बलदेव भामरा यांना शेतीच्या कामात मदत करत होता. आरोपी व मयत यांची शेती शेजारी असून, त्यांच्या जमिनीमधून ओढा जात आहे. कॅनॉलला पाणी आल्यावर ओढ्यात पाणी येऊन बंधारा पाण्याने भरला जातो. हे पाणी मयत राजेश शेतीसाठी वापरत होता. आरोपींच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता असून, औढा त्यांच्या हद्दीत येतो, असे आरोपींचे म्हणणे असल्याने त्यांनी घटनेच्या अगोदर दहा दिवसांपूर्वी बंधारा फोडून टाकला होता.
कुकडी कॅनॉलला दि. 6 मार्च 2017 रोजी पाणी येणार असल्याने, राजेश याने जेसीबी मशिन बोलावून ओढ्यात बंधार्‍याचे काम सुरू केले होते. त्यावेळेस आरोपींनी एकत्र जमून हॉकी स्टीक, काठ्या, लाकडी फाळ्या घेऊन राजेश यांना जबर मारहाण केली. त्याला वाचविण्यासाठी जसविंदर व तेजंदर हे गेले असता त्यांनीही आरोपींनी जबर मारहाण केली. राजेश यांना उपचारासाठी प्रारंभी जांबूत (ता.पारनेर) येथे व त्यानंतर नारायणगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Visit : Policenama.com