नितीन गडकरींना उच्च न्यायालयाची ‘नोटीस’, २३ ऑगस्टपर्यंत मागवले ‘उत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी न्यायाधीश अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी नितीन गडकरी व भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून २३ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले, वंचितचे नेते सागर डबरासे व मतदार मो. नफिस खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणूकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आले, त्यामुळे प्रत्यक्ष मतदान व मोजण्यात आलेली मतदान यात फरक आहे, याचा फायदा गडकरींना झाला. याशिवाय निवडणूक आधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्याच्या नियमांचे आणि तरतूदींचे पालन केले नाही. यामुळे गडकरी यांची निवडणूक रद्द करुन नागपूर लोकसभा मतदार संघात पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकार्त्यांचे म्हणणे आहे.

नितीन गडकरी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यांची बाजू अ‍ॅड. अभियान बाराहाते, अ‍ॅड. बरुणकुमार तर निवडणूक आयोगाची बाजू अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी मांडली. न्यायालय आता याबाबत काय निर्णय देणार आणि निवडणूक आयोग देण्यात आलेल्या तारखेत काय उत्तर सादर करणार हे २३ ऑगस्टलाच स्पष्ट होईल.

आरोग्यविषयक वृत्त