इथून आली स्फोटके, गडचिरोली स्फोटाबाबत नाना पटोलेंचा गंभीर आरोप

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी भुसूरूंगाचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये १५ जवान शहीद झाले होते. याबाबत माजी खासदार नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

गडचिरोलीत झालेल्या स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी सरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी लाईड्स कंपनीने मागवलेल्या स्फोटकांचा वापर केला आहे. या कंपनीने उत्खनन करण्यासाठी ही स्फोटके आणली होती. हीच स्फोटके नक्षलवाद्यांनी वापरल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. लाईड्स या कंपनीचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. या बाबत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले होते. अखेर याच कंपनीचे स्फटके वापरून नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या १५ पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या वास्तव्यासाठी लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करेल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर शहीद मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.