राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (२१ फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसांतच हा काॅपीचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी(२२ फेब्रुवारी) हिंदी विषयाची परीक्षा होती. पेपर सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच हा प्रकार सुरू झाला. परीक्षेतील सर्व प्रश्न बाहेर पोहोचवण्यात आले. काही तरुण एका प्रश्नाच्या उत्तराची १०० रुपयांना विक्री करत होते. तर उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रुपये लागतील, असं काही तरूण सांगत होते. शेजारीच असलेल्या बारुळ इथल्या श्री. शिवाजी विद्यालयातही असाच प्रकार सुरु होता असेही समजत आहे.
याव्यतिरीक्त आणखी धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर निर्बंध असतानाही काही जण सर्रास मोबाईलचा वापर करत होते अशी माहितीही समोर आली आहे. काॅपी पुरवण्यासाठी काही तरूण केंद्राबाहेरच तळ ठोकून उभे होते. काहीजण परीक्षा केंद्राची खिडकी गाठत आतमध्ये उत्तराच्या चिठ्ठ्या टाकत असतानाही आढळून आले. नांदेड जिल्ह्यात ८१ केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. २६१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७ हजार ७८२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.