मोदी बिथरलेत म्हणून राष्ट्रवादीवर टीका : जयंत पाटील यांचा टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – समोर पराभव दिसू लागला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले आहेत. म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मोदींना लगावला आहे. पाटील यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी जाण्यापूर्वी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले की, ‘सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी, वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी मोदी स्वतःच्या नावावर थोपवून घेतायेत. मोदींकडे भाषणासाठी मुद्दे नाहीत त्यामुळे ते विरोधकांवर टीका करत आहेत.’ तसेच शिवसेनेने साडे चार वर्षे भाजपवर जोरदार टीका केली आणि शेवटी मांडीला मांडी लावून बसले. अशी कोणती नामुष्की आली की शिवसेना भाजपसोबत गेली ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.