‘…त्याचप्रमाणे कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावरही PM मोदींचा फोटो हवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीत लसी वरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा होत असल्यावरून राज्यात टीकाटिपणी होत आहे. यावरूनच मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप केले आहे. त्या आरोपाबरोबरच मलिक यांनी पंतप्रधान मोदींना टोला देखील लगावला आहे. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.

नवाब मलिक बोलताना म्हणाले, भारतातील रुग्णसंख्या वाढत आहे. मृतांचा आकडाही जास्त आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींमध्ये जागा नाही. लोकांना रांगा लावाव्या लागत आहे, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ह्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने उत्तर द्यावं, पळ काढू नये. करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो छापण्यात आला. आमची मागणी आहे की, करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधानांचा फोटो हवा. अशा शब्दात नवाब मलिक पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, जर ते लसीकरणाचं श्रेय घेत असतील, तर त्यांनी मृत्यूची जबाबदारीही घ्यावी. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत मोदी सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे, केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीये. केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत. राज्य सरकारने १६ कंपन्यांकडे विचारणा केली असता त्यांनी केंद्राने राज्याला औषधी देण्यास नकार दिला असल्याचं सांगितलं. हे खेदजनक आणि धक्कादायक आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.