अखेर नासिरुद्दीन बोलले , ‘मी देशभक्त आहे, ओरडून सांगण्याची गरज नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील परिस्थिती बघून मला माझ्या मुलाविषयी काळजी वाटते असे वक्तव करून जेष्ट अभिनेते नसिरुद्दीन शहा वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला. एवढेच काय त्यांना पाकिस्तानचा रस्ता देखील दाखवण्यात आला. यावर आता नसिरुद्दीन शहा यांनी उत्तर दिले आहे “मी देशद्रोही नाही, देशभक्त आहे आणि हे मला ओरडून आणि गाजावाजा करून सांगण्याची गरज वाटत नाही,’ अशा शब्दांत नसिरुद्दीन शहा यांनी टीकाकारांना सुनावले आहे.
अजमेरपासून काही अंतरावर असलेल्या पुष्करमधील एका खासगी कार्यक्रमात नसिरुद्दीन शहा यांच्या ‘नसीर की नजीर फिर एक दिन’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.एका वृत्तसमूहाच्या वृत्तानुसार शहा यांनी याच कार्यक्रमात टीकाकारांना हे खडेबोल सुनावले आहेत. रविवारी अजमेरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शहा यांच्या या पुस्तक प्रकाशनाचा व्हिडिओ जारी करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हा देश माझाही आहे. हे मला गाजावाजा करून सांगण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं.
भारत माझी मातृभूमी
‘भारत माझी मातृभूमी आहे. मी देशद्रोही नाही. देशावर टीका करण्याच्या मलाही वेदना होतात. पण देशात जर चुकीचं काही घडत असेल तर मी बोलतच राहणार. मला देशाच्या भविष्याची चिंता सतावतेय. माझ्या चार पिढ्या या देशात जन्मल्या आहेत. माझा जन्मही इथेच झालाय. माझी मुलंही इथेच राहतील. माझं माझ्या देशावर प्रेम आहे आणि हे मला गाजावाजा करून सांगायची गरज नाही,’ असं ते म्हणाले. अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये गोंधळ होऊ नये म्हणूनच शहा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुष्कर येथे करण्यात आल्याचं’ टाइम्स नाऊ’च्या वृत्तात म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
उद्या हे लोक माझ्या मुलांना अडवून जात विचारतील अशी भीती जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली होती. तसेच या देशात गायीचा जीव पोलीस अधिकाऱ्यापेक्षा महत्वाचा झालाय. अशी सनसनाटी विधाने शहा यांनी केली होती. त्यानंतर त्यांना बऱ्याच टीकांचा सामना करावा लागतो आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावरून उत्तर प्रदेश येथील शिवसेनेच्या नेत्याने अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना देश सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगितले होते . या पक्षाने नसीरुद्दीन यांचे मुंबई ते कराची व्हाया कोलंबो असे विमानाचे तिकीट देखील बुक केले. त्यांना या पक्षाने १४ ऑगस्टला देश सोडण्याची धमकी दिली आहे. बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. त्यावरून शहा यांना भीती वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे असे या पक्षाने म्हटले आहे.
शहांना म्हंटले देशद्रोही…
उत्तर प्रदेशातील स्थानिक पक्षाचा अध्यक्ष अमित जानीने नसीरुद्दीन शहा यांना १४ ऑगस्ट पर्यंत देश सोडण्याची धमकी दिली आहे. त्याने शहा यांचे मुंबई ते कोलंबो आणि कोलंबो ते कराची असे हवाई तिकीट देखील बुक केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी नसीरुद्दीन शहा यांना देश सोडावा. जेणेकरून या देशातून एका देशद्रोह्याचे भार कमी होईल. असे त्याने धमकावले आहे.
बुलंद शहर हिंसाचार बाबतीत केले होते वक्तव्य
बुलंदशहरात गो तस्करीच्या संशयात जमावाने हिंसाचार माजला. तसेच बचाव करण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना नसीरुद्दीन शहा म्हणाले होते, की “बुलंदशहर हिंसाचारावरून या देशात पोलिस अधिकाऱ्यातच्या जीवापेक्षा गाय महत्वाची झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीला वातावरणात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला तर या गोष्टीची भीती वाटते, की उद्या हे लोक माझ्या मुलांना अडवून विचारतील की सांग तू हिंदू आहेस की मुसलमान..? या प्रश्नाचे त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल.